ठाणे : बौद्ध साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच नवोदित कवींना साहित्यिकांना विचारमंच उपलब्ध व्हावा व बौद्ध साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावे म्हणून बुद्धजयंतीचे औचित्य साधून ठाण्यात दुसऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध साहित्य प्रसार संस्था (केंद्रीय) व ठाण्यातील कळवा येथील क्रांतीसूर्य सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कळवा येथील कै. शाहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरी (पऱ्याचे मैदान) येथे १८ ते २० मे २०१९ या कालवधीत हा महोत्सव होईल.
या संमेलनाचे उद्घाटन नागपूर येथील जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक, बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड भूषवतील. क्रांतीसूर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड हे स्वागताध्यक्ष असतील. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर व दैनिक सम्राट वर्तमानपत्राचे संपादक बबनराव कांबळे, साहित्यिका उर्मिला पवार, इंदिरा आठवले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
१८ मे रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ठाणे कोर्टनाका ते विटावा या दरम्यान संविधान सन्मान रॅली निघेल. यात कवी संमेलन, ‘कवी जेव्हा गाऊ लागतो’ (परिसंवाद), ‘मी रमाई बोलत आहे’ (एकपात्री नाटक), चर्चासत्र, कथाकथन, त्रिरत्न पुरस्कार वितरण, बुद्ध, भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होतील.
‘बौद्ध साहित्याचा प्रसार व प्रचार करणे व समाजाचे प्रबोधन करणे ही आमची मुख्य भूमिका असून, त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी राज्यभरातून साहित्यिकांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा,’ असे आवाहन बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्रा. गायकवाड यांनी केले आहे.
संमेलनाविषयी :
कालावधी : १८ ते २० मे २०१९
स्थळ : कै. शाहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरी (पऱ्याचे मैदान), कळवा, ठाणे.